Monday 3 July 2017

"सांग प्रिये...

सांग प्रिये तू येशील ना...?
स्वप्नात रंग तू भरशील ना..?

हि रात आहे, हि वाट आहे
या वाटे वरती चाल करुनी
साथ तू माझी देशील ना...?

सांग प्रिये तू येशील ना...?
स्वप्नात रंग तू भरशील ना...?

                    आभाळसांज

                -मंगेश मिलिंद हरवंदे

Tuesday 7 February 2017

हॅपी जर्नी ...


हॅपी जर्नी ...

'रस्ता' या शब्दाबद्दल तुम्हाला काय वाटतं..?? तुम्हाला भटकंतीची आवड असेल किंवा पर्यटनामध्ये रस असेल तर हा शब्द तुम्हाला नक्कीच खूप लांब घेऊन जाईल. मात्र तुम्ही busy life जगत असाल तर हा शब्द तुमच्या फारसा संपर्कात नसेल.... 

सुरुवातीपासूनच भटकंतीची आवड, मात्र नुसती निसर्गरम्य प्रदेशातच नव्हे तर पायदळी तुडवत जाणारी कोणतीही वाट खुणावतेय असं वाटे.

तीन महिन्यांपूर्वीची ती आठवण. अजूनही आठवतो तो रस्ता...दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आज्जी आणि संपूर्ण कुटुंबाला घेऊन कोकणात गावाकडे निघालो होतो, गावी जायचं म्हंटल्यावर लहान मुलांची तर फारच मौज चालली होती. बरचसं सामान पॅक करून ठेवलं होतं, पण मीच ओरडलो, तीन दिवसांच्या ट्रिपसाठी इतकं सामान कशाला..??  

जेवण उरकून रात्रीच गाडी पकडण्याचा बेत केला होता. तशी रिसेर्वेशन पण केली होती, 'चार फुल दोन हाल्फ'
विंडो-सीट होती तरी रोजची ती ट्रॅफिक त्या खिडकीतून पाहवत नव्हती,आणि दिवसभराच्या थकव्याने झोपही लागली. यात कसला आलाय प्रवास...!!!

थेट जाग आली ती सकाळीच. डावा हाथ खिडकीवर टाकून झोपल्याने थोडा दुखत होता, छोटा मुलगा वृषभ मांडीवर डोकं ठेऊन शांत निजला होता. आतामात्र खिटकीतून नजर टाकली तर वाह... कोकण सारं इथेच असं भासू लागलं. थंडीचे दिवस असल्याने दाट धुकं पडलं होतं. सगळीकडे हिरवीगार पण थंडीने निस्तब्ध झालेली झाडं जणू मला अभिवादन करून माझं स्वागतच करत होती. काळ्याकुट्ट डांबरी रस्ता आणि त्या रस्त्यावरचा पहाटेचा मंद अंधार दूर सारत आमची बस वेगात चालली होती.

इतक्यातच पुढच्या वळणावर 'फट्ट' असा आवाज येऊन बस रस्त्याच्या कडेला घेतली गेली....!!!

हाहाहा...काय सांगू...!!! अर्थातच बस पंचर झाली होती-आणि मी खूप खुश.!!!

लहानपणी असच गंमत म्हणून वाटायचं कि गावापासून दूर कुठेतरी बस बंद पडावी, आणि आज तर गाव जवळून पाहण्याची संधी माझ्याकडे धावून आली होती. 

बस मधनं खाली उतरल्यावर समोर दूरपर्यंत गेलेला रस्ता जणू 'चल' म्हणत होता. पहाटेचा मंद वारा अंगावर शहारे उठवत होता. धुक्यामुळे फारदूरच काही दिसत नव्हतं. सभोवतीच्या झाडांवर पक्षांचा मधुर किलबिलाट मनाला प्रसन्न करत होता. एकदोन कुत्रीं रस्त्याच्या कडेला अंगाची पुरचुंडी करून झोपली होती. अर्थातच हा थंडीचा परिणाम होता. वातावरण कसं एकदम अल्हाददायक होतं .माझा तर विचार चाललेला कि घरापर्यंत असाच पायी प्रवास करावा...! पण बाकीच्या पण मंडळींचा विचार मनात आला आणि तसेच सोबत बऱ्याचशा बॅग होत्या. आज्जीने तर त्या बॅगेतुन स्वेटर काढून कधीच घातला होता. मी म्हंटलं, "अगं आज्जी सगळ्या जगाची थंडी तुझ्यावरच पडली आहे कि काय...??" यावर ती हसून म्हणाली, "अरे राजा वय झालं आता..!!"

मी आज्जीच्या खांद्यावर  हात टाकून चालत होतो, छोटी मुलं तर जणू झोपेतच चालत होती. मग छोट्या चिऊला आईने कडेवर घेतलं. एव्ह्ड्यातच मागून बैलगाडीचा आवाज आला, मला तर फार आनंद झाला, वाटलं आज कसं सगळं मनासारखं घडतंय. ती बैलगाडी म्हातारे आजोबा चालवत होते. थोडं जवळ आल्यावर विचारलं तर समजलं ते आमच्या इच्छित ठिकाणीच जवळपास कुठेतरी चालले होते. मी मुद्दाम थकल्या सारखा चेहरा करत त्यांना विचारलं,"आजोबा सोडालं काहो आम्हाला तिथंपर्यंत...??" क्षणाचाही विलंब न लावता ते 'चला' असं म्हणाले. कशीतरी जागा करत आम्ही सगळे बैल गाडीत बसलो. छोटी मुलं धरून ६-७ जणांची ती बैलगाडी रस्त्यावरून हळू-हळू चालू लागली. त्या वेळी जेव्हडा आनंद मला होत होता तितका आनंद कधीही न झाल्यासारखं  वाटत होतं. बहुतेक ते माझ्या चेहऱ्यावर सपशेल दिसलं असावं, म्हणूनच 'वैदेही' माझ्याकडे चोरट्या नजरेने पहात गालातल्या-गालातच हसत होती. कदाचित म्हणत असावी,"आज बऱ्याच दिवसांनी इतका बालिश झालाय." 

बैलगाडी अगदी संथ गतीने चालत होती आणि मलाही काही घाई नव्हती, बहुतेक त्या आजोबांना पण घाई नसावी...!!! मधेच कुठेतरी दवाचे थेंब अंगावर पडत होते. इकडे आई-वृषभ आणि आज्जीच्या गोष्टी चालल्या होत्या, त्याला शेतं, चिऊताई-खारुताई दाखवत होत्या. मधेच आजोबांचीही बडबड चालू होती जणू ते आमच्यातलेच झाले होते.

मी-चिऊ आणि वैदेही थोडं मागं सरकून बसलो होतो. चिऊला तर कसलाच पत्ता नव्हता बस बंद पडल्यापासून ती झोपलेलीच होती. तेव्हा सुद्धा वैदेहीच्या मांडीवर आरामात झोप काढत होती. मी या सगळ्यांच्याच शेजारी बसलो होतो, मी वैदेहीचा हात माझ्या हातात घेतला आणि तिच्याकडे पाहू लागलो. तसं ती मला पाहून म्हणाली,"आत्ता आठवण झाली का माझी...??" असं म्हणून ती मुद्दाम रूसवेला चेहरा करून दुसरीकडे पाहू लागली. तसा मी तिचा हात आणखी दाबून म्हंटल."कॉलेज चे दिवस आठवतायत का...??" मी आणि वैदेही एकाच कॉलेज मध्ये असताना चौपाटीवर कधीतरी घोडागाडीची केलेली सैर मला आठवली आणि त्या सोबतच्या बऱ्याच गमती-जमती मला आठवल्या. वैदेहीने ते बरोब्बर हेरलं असावं. तिने तोंडावर बोट ठेऊन "शू$$" असा आवाज काढत आई आणि आज्जीकडे पाहिलं. मी जोरात हसायला लागल्यावर या तिघांच्या गप्पा थांबल्या आज्जीने मला विचारलं, "काय झालं रे राजा ...??" मी वैदेही कडे पाहत "काहीच नाही"असं म्हंटल.

हा आमचा प्रवास मी कधीच विसरणार नव्हतो. या सर्व आठवणी नेहमीच माझ्या मनात तशाच ताज्या राहणार होत्या. या सर्वामध्ये रस्ता कधी संपला ते समजलच नाही. समोरून आमचं घर दिसत होतं. त्या आजोबांनी तर आम्हाला पूर्ण घरापर्यंतच सोडलं होतं. आमच्या अगोदरच पोहोचलेली आमची अर्धी मंडळी म्हणजे बाबा, काका, आजोबा आमची हि गंमत समोरूनच पहात होते. बैलगाडीतून उतरल्या वर आज्जीला विचारलं,"कसा होता प्रवास..??"
तशी आज्जी म्हणते कशी,"माझ्या राजा बरोबर प्रवास करायचा म्हणजे सगळ्या गोष्टीत अगोदरच मनाची तैयारी करून ठेवायला हवी...!!!" तशी सगळी मंडळी माझ्याकडे बघून हसायला लागली.



समाप्त.

                                                                                                                     "आभाळसांज"

                                                                                                                -मंगेश मिलिंद हरवंदे

Monday 6 February 2017

सुटकेचा निश्वास...


सुटकेचा निश्वास... 


जून महिन्याचा चौथा आठवडा असला तरी पावसाने काही हजेरी लावली नव्हती. सुकलेल्या शेतांवर भरपूर उन्हं कोसळत होती. दूरवर मंदिरापर्यंत गेलेल्या त्या रस्त्यावर मृगजळ तळपत होते. डोंगरावरील मंदिराच्या पायऱ्या देखील चांगल्याच तापल्या असाव्यात म्हणून तर इतरवेळी भिक्षा मागत बसलेली सर्व मंडळी कधीच आपापल्या झोपडीत शिरली होती.अंगाची पार लाही-लाही होत होती. उन्हाच्या त्या तडाक्यानं सुकत आलेल्या तळ्यात म्हशी मात्र मनसोक्त नाहत होत्या तर दुसरीकडे रस्त्याच्या कडेला कुत्रीं जीभा बाहेर काढून धापा टाकत थंडावा घेत होती.

'मृग नक्षत्र  सुरु व्हायचा वेळ आला...तरी पाऊस कुठं गेला..??' अशा विषयांच्या गप्पा मारत काही गावकरी मंडळी वडाच्या पारावर बसून तंबाखू  मळत होतें. समोरच त्या मातीच्या रस्त्या वरून एक आज्जी भाजी विकून नुकतीच घरी चालली होती. इतरवेळी वाटसरूंना सावली देणाऱ्या झाडांची पाने गळत असताना ती झाडे आकाशाकडे केविलवाणी पाहत होती. लहान मुले 'येरे-येरे पावसा' गाणं म्हणत होती. एकंदरीत सारं गाव उन्हाच्या त्या तडाख्याने त्रस्त झालं होतं...

विश्वकर्त्याला मात्र या गावाची दया आली असावी... अचानक ढगांमध्ये काही बदल होऊ लागले, मघाशीपर्यंत प्रखर वाटणारे उन्ह आता क्षीण होत चालले आणि वारा तर मागे वाघ लागल्या सारखा सैरावैरा पळू लागला. सूर्य आता ढगांच्या पडद्याआढ होत चालला होता. थोडाफार अंधार होऊन मधेच कुठेतरी आकाशात वीज चमकत होती. तोच आकाशातून पाण्याचे 'अनमोल मोती' बरसू लागले. तोच तो पाऊस ज्याची सर्व जण आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता का सारेजण त्या पासून वाचण्यासाठी आसरा दिसेल तिथे पळत होते..??

माघाशीची सर्व धापा टाकणारी कुत्रीं तर रस्त्याच्या कडेलागून असेल्या मंदिरात कधीच शिरली होती आणि पारावर बसलेली ती मंडळी घराकडे पळत होती. ओल्या मातीचा छान सुगंध पसरला होता...

मधेच एकाद वाहन आल्यावर त्यामागे धावत सुटणारी धूळ आता नाहीशी झाली होती. झाडांनी तर सुटकेचा निश्वास सोडला होता, आणि ती भाजी विकून आलेली आज्जी कधीच घरी पोहोचून 'येरे-येरे पावसा' गाणं म्हणणाऱ्या त्या मुलांना होड्या बनवून देत होती...

सारं गाव आता पावसाच्या सुखद-आनंदाश्रूंनी हसू लागलं होतं, आणि 'मी' देखील त्या आंब्याच्या झाडामागून चिंब भिजत हि सारी मजा पहात होतो.

समाप्त.

                                                                                                                 "आभाळसांज"

                                                                                                            -मंगेश मिलिंद हरवंदे


Sunday 5 February 2017

देव तारी ,त्याला कोण...??


देव तारी ,त्याला कोण...??


{उगाचचं देवाचं "प्रमोशन आणि मार्केटिंग" करून लोकांचा पाठिंबा आत्मसात केलेल्या भोंदू बाबांच्या संपर्कात आलो असतानाची सुचलेली एक छोटीशी टिपणी...}


दुपारची वेळ असावी, शाळेतली मुले कंटाळली होती. पण मात्र पुढचा तास ऑफ होता त्यामुळे धम्मालच-धम्माल...!!!

मुलं वह्यांची पानं फाडून विमानं बनवत होती, कोणाचं विमान जास्त उंच उडतंय याची पैज लागली होती. दुसरीकडे मुलींचाही गोंधळ काही कमी नव्हता. इथल्या-तिथल्या गोष्टी रंगल्या होत्या.

काही टवाळ मुलं पताक्यांचे धागे तोडत मस्ती करत होती एकंदरीत वातावरणात एकदम कल्लोळ माजला होता. शेजारचे दोन वर्ग सोडूनच हेडमास्टरांचे केबिन होते, दुर्दैवाने हा सारा कल्लोळ त्यांच्या कानापर्यंत पोहोचला, मुळातच स्वभावाने तापट डोक्याचा तो हेडमास्तर थेट त्या वर्गाच्या दिशेने निघाला... 


आता काय मुलांची चांगलीच वाजणार होती... मास्तर वर्गात पाऊल  ठेवल्यावर समोरच दृष्य- एक उंच उडालेलं विमान त्यांच्या डोक्यावरून मुलींच्या घोळक्यात शिरलं, पताक्याच्या तुटलेल्या धाग्याला एक मुलगा आणखी खाली खेचतोय, एक मुलगा तर चक्क गुरुजींच्या खुर्चीवर पाय  ठेऊन निलगिरी पर्वत उचलणाऱ्या हनुमंताची नक्कल करत होता...

मास्तरला समोर पाहताच 'वादळानंतरची शांतता' पसरली, खरं तर वादळ आत्ता येणार होतं. मास्तरची नजर त्या खुर्चीवर पाय ठेऊन हनुमंताची नक्कल करणाऱ्या मुलाकडेच... संतापलेल्या मास्तरांचा तो चेहरा जणू काही त्याला राक्षसा सारखा भासला असावा. घाबरगुंडीने मुलाच्या तोंडातून शब्द बाहेर पडले "बाप रे ..!!! देवा आता तूच मला वाचावं." 

देवा ...??  देव.. ?  ...आणि मला प्रश्न पडला कि खरंच आता देव त्या मुलाला मास्तरांकडून मिळणाऱ्या शिक्षेतून वाचवायला येणार का..?? आणि जरी देव आलाच तरी त्या मुलाला वाचवू शकेल का..??
... अर्थात मी नास्तिक वगैरे नाही, मी सुद्धा देवाचं अस्तित्व मानतो-किंबहुना बऱ्याच संकटांना तोंड देण्याची शक्ती देवाने मला दिली असं मी समजतो.  

पण मला पडलेला प्रश्न हा सध्याच्या परिस्थितीला समपर्कच आहे. अगदी ९९% लोकांचा देवावर विश्वास आहे. आपल्याकडे विविध पौर्वात्य मंदिरे पाहायला  मिळतात, लोक मनोभावाने त्या मंदिरातल्या मूर्तींसमोर नतमस्तक होताना दिसतात,

अनेक प्रकारचे नवस केले जातात, ते पूर्ण होतात किंवा पूर्ण होतील अशी लोकांची धारणा सुद्धा असते. पण खरंच कधी आपण असा विचार केला आहे का कि देव नावाची दैवी शक्ती या विश्वात आहे किंवा नाही..??  करणारे करतात असा विचार पण घाबरत-घाबरतच, म्हणजे असा विचार केल्याने खरंच  देव असेल तर तो कोणती मोठी शिक्षा तर नाही ना देणार.. वैगेरे-वैगेरे... 

आज समाजात भर दिवसा बलात्कार, खून, चोरी वैगेरे-वैगेरे सारख्या घटना घडत असतात तेव्हा कुठे असतो देव... अर्थात देव काही स्वतःहून  येऊन हे सगळं थांवणार वैगेरे अशातली गोष्ट नाही, पण तरी म्हणतात ना, देव सगळं पाहतो आहे.  मग खरंच एखाद्या मुलीच्या अब्रूचे लचके तोडत असताना  तो असा कसा पाहूशकतो..?? काय करत असतो तो तेव्हा ..? कि ते फक्त त्या मुलीचे भोग असतात आणि जरी ते तिचे भोग असले जरी ती त्या मुलीला मिळत असलेली शिक्षा असली तरी तो शिक्षा देणारा, तिच्या अब्रूचे लचके तोडणारा 'तो' कोण असतो..? तो पण एक पापच करत असतो ना..?? कि त्याने केलेल्या चांगल्या कर्माची फळं असतात ती..?? काय उत्तर आहे याचं ..??

माणूस जी तीव्र इच्छा प्रकट (will power) करतो हे त्याचं मागणं असतं. आणि त्याच्या या तीव्रतेनेच त्याच मागणं कधी पूर्ण होतं तर कधी नाही होत. 

साधी गोष्टच घ्याना, नैसर्गिक आपत्तीआल्यानंतर जे लोक तडफडत मरतात ते त्यांचे भोग असतात का ..? ती त्यांना मिळालेली शिक्षा असते का..?? आणि जर ते त्यांचे भोग असतील तर ज्या ठिकाणी आपत्ती आली  त्या ठिकाणचे सगळेच लोक पापी होते असं म्हणणं कितपत योग्य ठरेल ..?? त्या आप्पत्तीग्रस्त भागात कित्तेक मंदिरे सुद्धा असतात मग त्याला काय म्हणता येईल..??

मग का नाही दया येत देवाला त्या म्हातारीची, जी दिवसभर उभीराहुन, ज्या वयात नातवंडांना अंगाखांद्यावर खेळवायला पाहिजे त्याच अंगाखांद्यावर फाटलेल्या चोळीचे  तुकडे लपेटून सिग्नलवर भीक मागत असते. का नाही येत..??

का एखाद्या प्रामाणिक माणसाला टेबलाखालून "मिठाईची पूडी"  देवू करून  लाचखोर बनवलं जातं ...?? असतो कुठे तेव्हा तो देव..??

मी नास्तिक नाही हे मी पहिलंच स्पष्ट केलंय अर्थात. मी सुद्धा देवाला मानतो, पण विशिष्ठ मर्यादेपर्यंतच.

समुद्रात प्रत्यक्ष उडी मारल्या नंतर देवाचा धाव केल्यावर तो मला नक्की वाचवेल असं म्हणणं कितपत योग्य आहे..?? स्वतः पोहण्याचा प्रयत्न केल्याशिवाय किनारा कसा मिळणार..?? 

.....पुढे त्या खुर्चीवर पाय ठेऊन हनुमंताची नक्कल करणाऱ्या मुलाने मास्तरांचा मार मात्र नक्कीच खाल्ला.. पण देवाचं नाव घेतल्याने कमी मार खाल्ला असेल असं म्हणू शकता तुम्ही हवं तर. .....!!!


समाप्त. 
                                                                                                                    "आभाळसांज"

                                                                                                               -मंगेश मिलिंद हरवंदे